नवी दिल्ली- कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे कमी होत असल्याचे आढळून आल्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने जवळपास दोन वर्षांनंतर 31 मार्चपासून कोविड-19 शी संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, मास्क घालण्याचे आणि सामाजिक अंतर राखण्याचे नियम लागू राहतील.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या 24 महिन्यांत जागतिक महामारीच्या व्यवस्थापनातील अनेक महत्त्वाचे टप्पे पार पडले. लसीकरण, रूग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विकास याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आले. असे भल्ला म्हणाले.
ते म्हणाले की राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी देखील त्यांच्या क्षमता आणि प्रणाली विकसित केल्या आहेत आणि जागतिक महामारीच्या व्यवस्थापनासाठी त्यांच्या तपशीलवार विशिष्ट योजना लागू केल्या आहेत. गेल्या सात आठवड्यांत नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 22 मार्च रोजी कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 23 हजार 913 वर आली होती आणि संसर्गाचे प्रमाण 0.28 टक्के होते. देशात कोविड-19 विरोधी लसींचे 181.56 कोटी पेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत.
भल्ला यांच्या मते, लागू नियमांची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे आणि त्यानंतर गृह मंत्रालयाकडून या संदर्भात कोणतेही आदेश जारी केले जाणार नाहीत. ते म्हणाले की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड-19 चा सामना करण्यासाठी काही उपाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जसे की मास्क घालणे आणि हात स्वच्छ ठेवणे. आजाराचे स्वरूप पाहता लोकांनी अजूनही सतर्क राहण्याची गरज आहे.
संसर्गाची प्रकरणे वाढल्यास, आरोग्य मंत्रालयाने वेळोवेळी दिलेल्या सल्ल्यानुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश स्थानिक पातळीवर त्वरित आणि सक्रिय कारवाई करण्याचा विचार करू शकतात.