अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भांडण सोडवायला गेलेल्या महिलेची तिच्या मेव्हण्यानेच हत्या (Murder) केली आहे. सुशाला राजेंद्र किर्तने (Sushala Rajendra Kirtane) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य चौघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या हत्येप्रकरणी शहादेव रामकिसन धायतडक, शुभम शहादेव धायतडक, रणजीत आजिनाथ धायतडक, अक्षय सखाराम धायतडक, संदीप बाळासाहेब शिरसाट, सोमनाथ गणपत घुले यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमधील शहादेव धायतडक आणि शुभम धायतडक यांना पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत सुशाला किर्तने यांचा भाऊ बाळासाहेब शिरसाट याचा सोमवारी बडे वाडी या ठिकाणी दहाव्याचा कार्यक्रम होता. या ठिकाणी सुशाला यांचा शहादेव धायतडक यांच्यासोबत वाद झाला होता. शहादेव धायतडक हा सुशाला यांचा मेव्हणा आहे. दोघा मेव्हण्यांची भांडणे झाल्यानंतर बाळासाहेब हा सुशाला यांच्याकडे किर्तनवाडीला आला होता. सुशाला यांच्या मुलाचे रविवारी लग्न झाले होते. लग्नानंतरचा रीतिरिवाज असल्याने बाळासाहेब हे बहिणीकडे आले होते.
यादरम्यान बाळासाहेब यांच्या मागे त्यांचा मेव्हणा शहादेव धायतडक, त्याचा मुलगा शुभम धायतडक आणि अन्य चौघेजण हत्यार घेऊन आले. यावेळी त्या ठिकाणी मोठा वाद झाला. राजेंद्र किर्तने आणि सुशाला किर्तने यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने शुभमने सुशाला यांच्या डोक्यात दांडक्याने मारहाण केली. यानंतर सुशाला या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.