पुणे : 5 वर्षांहून अधिक काळ मांजरी रेल्वे फाटक येथे मृत अवस्थेत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करून तातडीने हे काम पूर्ण करावे यासाठी मांजरीकरांच्या वतीने आज साखळी उपोषण आंदोलनाला सुरवात करण्यात आली.
कुठलाही पक्ष, संघटना, संस्था यापैकी कशाचाच पुरस्कार न करता समस्त मांजरीकर या बॅनरखाली लोक एकत्र येऊन हे आंदोलन करत असून, सरकारने योग्य ती दखल न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांकरवी देण्यात आला आहे.
पुलाच्या प्रलंबित कामामुळे मांजरीकर नागरिक अतिशय गंभीर स्वरूपाच्या वाहतूक समस्येला तोंड देतो आहे. २०१४ ते १९ च्या कार्यकाळात हाती घेण्यात आलेले उड्डाणपुलाचे काम आजही पूर्ण झाले नसून सरकारी अधिकारी व प्रशासनाच्या वतीने नेहमीच पुढची तारीख देण्यात येत असून परिस्थिती जैसे थे अशीच असल्याने नागरिकांचा विशेष रोष आहे.
या पूलाच्या कामाने सर्व गावकर्यांना वाहतुकीसाठी पडणारा वेढा म्हणजे मनस्ताप झाला असून, आर्थिक दृष्ट्याही ही बाब बरीच खर्चीक होऊन बसली आहे. पूलाच्या कामामुळे परिसरातील रस्त्यांची झालेली भयाण दुर्दशा तर खरच आम्ही महानगरपालिका हद्दी समाविष्ट आहोत की गावाला अजून ग्रामपंचायतीच दर्जा मिळायलाही अवकाश आहे असाच प्रश्न पडतो.
सदर रस्त्याच्या रखडलेल्या कामातून निर्माण अडथळ्यामुळे नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. जीवंत माणसांना तर या ब्रीजचा त्रास आहेच पण एखाद्याचा अंत्यविधी पार पाडायचा असल्यासही नदीला जाण्यासाठी आमच्या नागरिकांना 15 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते आहे.