मुंबई : जिल्हाप्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ” आगामी 2024 ची निवडणूक शेवटची असेल. त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो.” अशी टीका भाजपवर त्यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज जी परिस्थिती भाजपने शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे. ही परिस्थिती ते उद्या देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आत्ता जर यांचा सामना केला नाही, तर कदाचित आगामी 2024 ची निवडणूक शेवटची असेल. त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाबाबत देखील तीखट शब्दात टीका करताना म्हटले आहे की, शिंदे गटाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव चोरलं आहे. हा पूर्वनियोजित कट होता. त्यांनी शिवसेना नाव चोरलं असलं तरी ते ठाकरे हे नाव नाही चोरू शकत. मी माँ आणि बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलो, हे माझं भाग्य आहे. हे भाग्य त्यांना मिळू शकत नाही. दिल्लीवाले त्यांना हे भाग्य देऊ शकत नाहीत.
तसेच यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले की, निवडणूक आयोग बरखास्त केल पाहिजे. निवडणूक प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत. अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.