मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या एक प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीला रवाना होण्यासाठी निघाले आहेत. दापोलीला परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणारच असा निर्धार केला आहे.
ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक हातोडा घेऊन अनेक कार्यकर्त्यांसह दापोलीकडे निघाले आहेत. नवी मुंबई मध्ये त्यांचं भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र नील सोमय्या देखील होते. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना ओपन चॅलेंज केलं आहे. उद्धव ठाकरेअनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्ट वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल परबला आज ना उद्या मंत्रीमंडळातून बाहेर काढावं लागणार आहे. दोन्ही अनिल परबांचे रिसोर्ट आहेत. मग एकावरच कारवाई आणि दुसऱ्यावर का नाही? असा सवाल सोमय्या यांनी केला.
ठाकरे सरकार घोटाळेबाजांना पाठीशी घालणार असेल तर कारवाई त्यांच्यावरही होणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन हे अनधिकृत रिसॉर्ट आहे असे सांगावे’ असे त्यांनी आव्हान दिले.
सोमय्या म्हणाले, की ‘हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे. उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हातपाय त्यांनी कधीच तोडले असते, मात्र मला सुरक्षा आहे म्हणून मी वाचलो. माझ्या मागे जनता आहे, मोदी सरकारची झेड कॅटेगिरी सुरक्षा आहे. मी पुरावे दिलेत आणि मलाच जेलमध्ये टाकू म्हणतात. नवाब मलिक गेलेत, मात्र डर्टी डझनवर अजून कारवाई होणार आहे. चोरी लबाडी पकडली तर हे असं वागतात. हे चालू देणार नाही. माफियागिरी दाऊदगिरी महाराष्ट्रात चालू देणार नाही’.
यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक आणि मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचे कॅबिनेट प्रताप सरनाईक यांचे अनधिकृत बांधकाम वाचण्यात मग्न आहे. तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोमय्या यांनी केला.