मुंबई : आशियाई गेम्सच्या पुरुष क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच सामन्यामध्ये नेपाळच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी (T-20 World Record) केली आहे. नेपाळच्या संघाने मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये तब्बल 314 रन केले आहेत. विशेष म्हणजेच केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये एकाच डावात 300 धावांचा टप्पा ओलांडणारा नेपाळ हा पहिला देश ठरला आहे.
नेपाळचा फलंदाज कुशल मल्लाने टी-20 च्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. 34 चेंडूंमध्ये कुशलने शतक झळकावलं आहे. याशिवाय दीपेंद्र सिंह ऐरी नावाच्या नेपाळच्या फलंदाजाने टी-20 मधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं असून केवळ 9 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं आहे. याबरोबर दीपेंद्रने सिंहने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा टी-20 मधील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. युवराजने 2007 साली झालेल्या टी-20 च्या पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. यामध्ये त्याने 12 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले होते.
षटकार आणि चौकारांचा पाडला पाऊस
नेपाळच्या फलंदाजांनी 314 धावांचा डोंगर उभारताना 26 षटकार, 14 चौकार लगावले. म्हणजेच नेपाळच्या फलंदाजांनी केवळ चौकार, षटकारांच्या माध्यमातून 212 धावा केल्या. कुशल मल्लाने 50 चेंडूंमध्ये 137 धावांची खेळी केली. त्याने 12 षटकार आणि 8 चौकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट 237 इतका होता. तर दीपेंद्र सिंहने तब्बल 520 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास नेपाळच्या संघाने हा सामना 273 धावांनी जिंकला. मंगोलियाचा संपूर्ण संघ अवघ्या 41 धावांमध्ये गारद झाला.