कोलंबो- श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने आपल्या देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. श्रीलंकेतील गंभीर आर्थिक संकटाबाबत सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना जयसूर्या यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी देशातील परिस्थिती “दुर्दैवी” असल्याचे वर्णन केले. तसेच भारताचे आभार मानले आहेत.
सनथ जयसूर्याने भारताचे वर्णन आपला मोठा भाऊ असे केले आहे.तो म्हणाला की, आपल्या देशाचा शेजारी आणि मोठा भाऊ म्हणून भारताने आपल्याला नेहमीच मदत केली आहे. आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत. आमच्यासाठी, सध्याच्या परिस्थितीमुळे जगणे सोपे नाही. भारत आणि इतर देशांच्या मदतीने यातून बाहेर पडण्याची आम्हाला आशा आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जयसूर्या म्हणाला की, देशातील जनता अनेक महिन्यांपासून या परिस्थितीतून जात आहे. लोक या परिस्थितीतून जात आहेत हे दुर्दैवी आहे. ते असे जगू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. गॅसचा तुटवडा असून तासनतास वीजपुरवठा होत नाही. श्रीलंकेतील लोकांना दैनंदिन वापरासाठी जीवनावश्यक वस्तू मिळण्यात अडचणी येत आहेत. आम्हाला या गोष्टी होताना बघायच्या नाहीत. डिझेल, गॅस, दूध पावडरसाठी तीन ते चार किमीच्या लांबलचक रांगा आहेत. हे खरोखरच दुःखद आहे.
लोकांनी आता श्रीलंका सरकारचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर त्याचे रूपांतर आपत्तीत होईल. देशातील आर्थिक संकटासाठी जयसूर्याने विद्यमान सरकारला जबाबदार धरले. ते म्हणाले की, सध्या ही जबाबदारी सरकारची आहे. या सरकारवर श्रीलंकेतील लोकांचा खूप विश्वास होता. सध्याच्या सरकारने जे काही केले ते चांगले झालेले नाही.