ठाणे : ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यातील हद्दीत एका तरुणानं राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रेयसीसाठी घेतलेल्या कर्जाच्या नैराश्यातून या तरुणानं आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं असून आत्महत्येपूर्वी तशा आशयाची एक चिठ्ठी त्यानं लिहून ठेवल्याचं आढळून आलं आहे.
“आपण प्रेयसीमुळे कर्जबाजारी झालो असून पैशांचीमागणी केल्यानंतर प्रेयसीकडून वारंवार पोलिसांची धमकी दिली जात होती आणि याच नैराश्यातून आपण आत्महत्या करत असल्याचं या चिट्ठीत नमूद करण्यात आलंय. या चिठ्ठीत त्यानं प्रेयसीचं नावही नमूद केलं आहे. या प्रकरणी प्रियकराच्या आईच्या फिर्यादीवरून आणि मिळालेल्या चिठ्ठीवरून कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ठाण्यातील रमाबाई आंबेडकर सोसायटी, कळवा येथे राहणाऱ्या 26 वर्षीय विक्रम मोरे या तरुणाचे त्याच परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबध होते. विक्रमनं प्रेयसीच्या मागणीवरून एका खाजगी फायनान्स कंपनीतून कर्ज घेतलं होतं. मात्र काही महिने कर्जफेड न केल्यामुळे फायनान्स कंपनीनं त्याच्यामागं कर्जफेडीचा तगादा लावला होता.
ही बाब विक्रमनं प्रेयसीच्या लक्षात आणून देत तिला पैसे फेडण्यासाठी सांगितलं मात्र तिनं याप्रकरणी टाळाटाळ सुरू केली आणि विक्रमलाच पोलिसांची धमकी देऊ लागली. अखेर आपल्यावरील दबाव आणि नैराश्यातून विक्रम मोरे यान राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. 13 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेला विक्रम एका खाजगी कंपनीत कामास होता.