कोलकाता- एकेकाळी भाजपमध्ये मंत्रिपद उपभोगलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर पोटनिवडणूक लढवत आहेत. तीन राज्यांतील विधानसभेच्या चार जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत आसनसोलमध्ये 12.77 टक्के तर बालीगंगे मतदारसंघात 8 टक्के मतदान झालं आहे.
भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांच्या राजीनाम्यामुळे आसनसोल लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. तृणमूल काँग्रेसला यापूर्वी कधीही आसनसोलच्या जागेवर विजय मिळवता आलेला नाही. यंदा मात्र 2019 मध्ये भाजप सोडणारे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आसनसोल मतदारसंघातील बिगर बंगाली लोकांमध्ये प्रभाव पाडून विजय मिळवतील अशी तृणमूलला आशा आहे. सिन्हा यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल आहेत. भाजपने अनेक स्टार प्रचारकांसह आसनसोल मतदारसंघात जोरदार प्रचार केला आहे.
दरम्यान, भाजपने आसनसोल मतदारसंघात बाहेरच्या व्यक्तीला आणल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांच्यावर केला होता. यावर प्रत्युत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं की, ‘मी आता फक्त ‘बिहारी बाबू’ राहिलो नाहीत, तर आता ‘बंगाली बाबू’ही आहे.’ प्रचाराच्या भाषणातही त्यांनी अनेकदा बंगाली भाषेचा वापर केला.