संजय बियाणी यांची अंतयात्रा रोखली, आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी

249 0

नांदेड- शहरातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी दोषींना तत्काळ अटक व्हावी, अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी बियाणी यांची अंत्ययात्रा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रोखून धरली. अंत्ययात्रेत नागरिकांचा मोठा जमाव एकत्र आला होता. या प्रकारामुळे काहीकाळ येथील वातावरण तणावपूर्ण झाले.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता बियाणी यांच्या राहत्या घराबाहेर गोळीबार करून त्यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. शारदानगर येथील त्यांच्या घराबाहेर त्यांच्यावर तब्ब्ल १२ गोळ्या झाडण्यात आल्या. बियाणी यांचा मंगळवारी दुपारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली.
आज संजय बियाणी यांची अंतयात्रा निघाली.

संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. या अंतयात्रेत मोठा जनसमुदाय सहभागी झाला. संतप्त नागरिकांनी अंतयात्रा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रोखून धरली. जोपर्यंत आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत अंतयात्रा पुढे नेणार नाही असा पवित्रा संतप्त जमावाने घेतला होता. अखेर अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी आश्वासन दिल्यानंतर अंतयात्रा पुढे गेली.

दरम्यान, या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून गुंडांनी त्यांना अगदी जवळून मारल्याचे त्यात दिसले. नांदेडमधील नागरिकांना स्वस्तात फ्लॅट देणारे म्हणून संजय बियाणी यांची ओळख निर्माण झाली होती. मागील आठवड्यातच त्यांनी 73 कुटुंबांना स्वस्तात घरे उपलब्ध करून दिली होती. तीन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड रिंदा याने खंडणी वसुलीसाठी त्यांना धमकी दिली होती. तेव्हापासून त्यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वीच त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!