पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असणारे अन्नधान्य १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना मोफत वितरीत करण्याचा निर्णय केंद्र शासनाने जाहीर केला आहे. डिसेंबर २०२२ चे धान्य घेतले नाही अशा लाभार्थ्यांनी जानेवारी २०२३ मध्ये या दोन्ही महिन्यांचे धान्य मोफत प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ, २ रुपये दराने गहू आणि १ रुपये प्रतिकिलो दराने भरडधान्य वितरीत करण्यात येते. तथापि, केंद्र शासनाने २८ डिसेंबर रोजीच्या पत्राने सदर अन्नधान्य सन २०२३ मध्ये मोफत वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्रीमती माने यांनी कळवले आहे.