औरंगाबाद- निवडणुकीसाठी बायको पाहिजे, अशी बॅनरबाजी करून औरंगाबाद शहरात खळबळ उडवणाऱ्या एका राजकीय कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश विनायक पाटील असं या तरुणाचं नाव आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांना तिसरे अपत्य झाले. कायद्याप्रमाणे तीन अपत्य झालेल्या व्यक्तीला महापालिका निवडणूक लढता येत नाही, मात्र ती लढवण्याची पाटील यांची खूप इच्छा असल्यामुळे त्यांनी औरंगाबाद शहरात निवडणुकीसाठी बायको पाहिजे अशी बॅनरबाजी करून खळबळ उडवून दिली.
या बॅनरबाजीचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या बॅनरवर शाई फेकून या वृत्तीचा जोरदार निषेध केला. तसेच महिला आयोगानेही या घटनेबाबत संबंधित तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. निवडणूक लढवण्यासाठी महिलांचा असा अपमान सहन करणार नाही, असे महिलांनी ठणकावून सांगितले. आता रमेश पाटीलच्या विरोधात औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.