देशातील टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या किमती अवाच्या सवा केल्याने सर्वसामान्य ग्राहक प्रचंड हैराण झाले आहेत. मोबाईल रिचार्जच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. परंतु 2025 वर्ष उजाडायच्या आधीच ट्रायने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला.
टेलिकॉम कंपन्यांनी या वर्षी जुलैमध्ये रिचार्जच्या किमती 25 टक्क्यांनी वाढवल्या. जिओच्या 239 रुपयांच्या प्लानची किंमत 299 रुपये तर एअरटेलचा 179 रुपयांचा प्लान 199 रुपयांवर पोहोचला. वार्षिक प्लानमध्ये किमान 300 ते 400 रुपयांची वाढ कंपन्यांनी केली. त्यामुळे मोबाईल ग्राहक प्रचंड हैराण झाला होता. आता ट्रायने मोबाईल रिचार्ज किमंत वाढीची दखल घेतली.रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल या दूरसंचार कंपन्यांना व्हाईस कॉलिंग आणि एसएमएससाठी दोन स्वतंत्र प्लान जारी करणे बंधनकारक करण्यात आलंय.तसेच रिचार्ज कूपनवरील 90 दिवसांची मर्यादा हटवून 365 दिवसांपर्यंत वाढवली आहे. ट्रायच्या या निर्देशानंतर टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांना आता व्हाईस कॉलिंग आणि एसएमएस पॅकिंगचा स्वतंत्र पर्याय द्यावा लागणार आहे. अनेक यूजर्स फक्त कॉलिंग वापरतात. त्यांना एसएमएसची गरज नसते. परंतु कंपन्या ग्राहकांकडून डेटा पॅकसोबत कॉलिंग आणि एसएमएसच्या रिचार्जचे पैसे वसूल करतात. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज महाग होतात. परंतु ट्रायच्या या निर्णयामुळे मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.