कुंटे खो… देशमुख खो… परब खो… खो-खो..! (संपादकीय)

341 0

अनिल देशमुख मला पोलिसांच्या बदल्यांची यादी पाठवायचे : कुंटे
अनिल परब मला पोलिसांच्या बदल्यांची यादी पाठवायचे : देशमुख
याबाबत आमच्याकडे कुठलीही माहिती नाही; तपासावं लागेल : परब
———————-
महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्या-संत्र्यांकडून सध्या ‘खो-खो’ चा खेळ सुरूय. पारंपरिक खो-खो खेळात एकमेकांना खो देऊन प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला बाद करायचं असतं पण या राजकीय खो-खो खेळात कोण कुणाला (बर) बाद करतंय हेच कळायला मार्ग नाही.

सीताराम कुंटेंकडून पहिला खो..!

हा राजकीय खो-खो चा खेळ सुरू झाल्यानंतर पहिला खो दिला तो माजी अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी. ‘मी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) या पदावर असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख माझ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे. त्यामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची हे नमूद केलेलं असायचं. देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे याच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोचवल्या जात असत. मी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करीत असल्यानं संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. देशमुखांकडून आलेली यादी ही पोलीस आस्थापना मंडळाच्या सर्व सदस्यांना दाखवली जात असे. तसेच ही यादी देशमुख यांच्याकडून आल्याचं मी मंडळाच्या सदस्यांना तोंडी सांगत असे. त्यामुळं पोलिसांच्या बदल्या करताना त्या त्या नावांचा समावेश केला जायचा.’

अनिल देशमुखांकडून दुसरा खो..!

या राजकीय खो-खो च्या खेळात दुसरा खो दिला तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी. ‘पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे. मला कुठल्याही व्यक्तीनं नव्हे तर अनिल परब यांनी यादी दिली होती. तीच यादी मी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती. कदाचित अनिल परब यांना शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी मिळायची आणि ते ती माझ्याकडे द्यायचे. अनिल परब यांनी दिलेली यादी अतिरिक्त मुख्य सचिवांनी देताना मी त्यांना सांगितलं होतं की, जर बदल्या नियमांत बसत असतील तरच ही प्रक्रिया करा अन्यथा करू नका. ‘सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुखांना खो दिला तर अनिल देशमुखांनी अनिल परबांना खो दिला. आता अनिल परब कुणाला खो देतात त्यावर हा खेळ अधिक रंगत जाणार आहे.

मंत्री परिवहन खात्याचे आणि करतायत पोलिसांच्या बदल्या ?

परिवहन खात्याच्या मंत्र्यांचा पोलिसांच्या बदल्यांशी काय संबंध, असा प्रश्न एव्हाना महाराष्ट्राच्या जनतेला नक्की पडला असेल. तिकडं गेली कित्येक महिने खितपत पडलेला एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्याऐवजी हे परिवहनमंत्री पोलीस खात्यात का नाक खुपसतायत, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळणं आता आवश्यक बनलंय.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुरू असलेला हा खो-खो चा खेळ पाहाता या खेळाचा अंतिम निकाल हा इतक्या लवकर लागेल, असं अजिबात वाटत नाही कारण हा खेळ आता कुठं सुरू झालाय. त्यामुळं या खेळात कोण बाद होतंय आणि कोण नाबाद राहतंय हे पाहात राहणं बस इतकंच काय ते या खेळाचे प्रेक्षक बनलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या हाती आहे. तूर्तास, पाहात राहा… खो-खो..!

-संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!