पुणे : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे.राज्यात ठिकाणी ठिकाणी आंदोलनाला (Maratha Reservation) हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. जाळपोळ, तोडफोड या गोष्टी आंदोलकांकडून केल्या जात आहेत. यादरम्यान पुण्याचे मा. आमदार जगदीश तुकाराम मुळीक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मराठा बांधवाना आरक्षण देण्याची विनंती केली आहे.
काय लिहिले आहे पत्रामध्ये?
प्रति
मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई – 32.
विषय: – मराठा बांधवाना आरक्षण देणेबाबत …
महोदय,
वरील विषयान्वये महाराष्ट्रात सर्वत्र मराठा बांधव हा आरक्षण विषयावर आंदोलन करत आहे. मराठा बांधवांच्या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण योगदान आहे. मराठा बांधवातील मुख्य व्यवसाय हा शेती असून, मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हा अल्पभूधारक आहे. मराठा बांधवास सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मराठा बांधवास आरक्षण नसल्याने गरीब मराठा कुटुंबातील मुले अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत. आज समाजाची परिस्थिती पाहता मराठा बांधवाला आरक्षण देणे गरजेचे आहे.
तसेच मी महाराष्ट्र राज्य विधानसभाचा माजी सदस्य या नात्याने सकल मराठा बांधवांना आरक्षण द्यावे अशी मागणी करतो. सरकारने या बाबत सकारात्मक निर्णय घेऊन मराठा बांधवाचा आरक्षण प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी विनंती करतो.
आपला विश्वासू
मा. आमदार जगदीश तुकाराम मुळीक