पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे भिडे गुरुजींच्या (Bhide Guruji) अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोलवडी येथे जाहीर सभेत बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात त्यांच्यासह सभेच्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
शनिवारी सायंकाळी कोलवडी येथील एका मंगल कार्यालयात भिडे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना संभाजी भिंडे यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली. त्यांनी तिरंगा ध्वजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. सोबतच दोन समाजामध्ये तेढे निर्माण होईल अशीही काही वादग्रस्त विधानं भिडे यांनी या सभेत केली. या प्रकरणी अखेर भिडे यांच्यासह आयोजकांवर पुण्यातील लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘इंडिया आघाडीच्या बैठकीवर टिका’
या सभेत बोलताना भिडे गुरुजींनी इंडिया आघाडीच्या बैठकीवरदेखील जोरदार टीका केली. ही बैठक कौरवाच्या वंशाची असल्याचं वादग्रस्त विधान भिडे गुरुजी यांनी केलं आहे. यावरू आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भिडे गुरुजींच्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.