मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एकला चलो रेची भूमिका घेणार असल्याचे समजत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पक्ष पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना आपण 200 ते 250 जागांसाठी तयारीला लागलं पाहिजे असे म्हंटले आहे. तसेच मनसे पदाधिकारी बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केल्याची माहिती समोर येत असून राज ठाकरेंनी आपण कोणत्याही पक्षाकडे जागा मागण्यासाठी तसेच जागावाटपाची चर्चा करण्यासाठी जाणार नसल्याचे संकेत दिल्याचे समजते.
काय घडले बैठकीत?
“लोकसभा निवडणुकीत मनसैनिकानी चांगलं काम केलं म्हणून राज्यात महायुतीला चांगलं यश आले,” असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं समजतं. उद्धव ठाकरेंना झालेलं हे मतदान मोदीविरोधातील मतदान आहे, असंही राज यांनी म्हटलं. “राज्यातील फोडाफोडीचे राजकारण लोकांना आवडलं नाही. मोदी नको म्हणू (अँटी मोदी) काहींनी महविकास आघाडीला मतदान केलं,” असंही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या भाषणात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, “स्वबळावर 225 ते 250 जागा लढवण्यास तयार रहावे,” असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.