राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झालेले पाहायला मिळत आहे. राज्य सरकारकडून सगे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर अजूनही सकारात्मक भूमिका आलेली नाही. तसा अध्यादेशही निघालेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे दिवसेंदिवस आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा मोर्चातर्फे 288 जागांवर उमेदवार देऊ, अशी घोषणा जरांगे यांनी याआधी केली आहे. त्याच अनुषंगाने विधानसभेच्या 127 जागांवर त्यांचा सर्व्हे देखील पूर्ण झाला आहे, अशी माहिती स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आमच्याकडून वेळ मागून घेतली आहे. मात्र आम्ही याआधीही सांगितले आहे की आम्ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत. माझा आणि माझ्या मराठा समाजाचा राजकरणात येण्याचा उद्देश नाही पण हे सरकारच आम्हाला राजकारणात ढकलत आहे. त्यामुळेच आम्ही आता शांत बसणार नाही. पहिल्या टप्प्यात आम्ही 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता, वेळप्रसंगी मराठा, दलित, मुस्लिम आणि लिंगायत समाजाला सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढवू. सर्व समाज आमच्या बरोबर आले पाहिजे यासाठी प्रयत्न करू. या सरकारने आम्हाला लवकरात लवकर आरक्षण दिले नाही तर विधानसभेला आमचे उमेदवार उभे करू. त्यासाठीच 127 जागांवर आम्ही सर्व्हे देखील केला आहे. पुढच्या टप्प्यात आणखी काही जागांची चाचपणी करणार आहोत. मात्र हे उमेदवार उभे करण्यासाठी स्वतःचा पक्ष स्थापन करणार की अपक्ष निवडणूक लढवणार हे अद्याप ठरवलेले नाही.
मनोज जरांगे पाटील हे 288 जागांवर उमेदवार देणार असल्याचे सांगत आहेत. मात्र यामध्ये ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता जरांगे यांनी कोणत्या जागांवर सर्व्हे केला आहे. त्यांचे उमेदवार कोण असतील याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीदेखील विधानसभेत 288 जागांवर ओबीसी उमेदवार उभे करू अशी घोषणा केली आहे. त्यापैकी 199 जागांवर सर्व्हे केला आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे आता हा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा विधानसभा निवडणुकीतही पहायला मिळण्याचे शक्यता आहे.