कोल्हापूर : कथा, कविता, चित्रपट, नाटक, पथनाट्य, समीक्षा, संशोधनपर लेखन आदी क्षेत्रांत आपली छाप उमटवणारे साहित्यिक-कार्यकर्ते प्रा. राजा शिरगुप्पे (Rajabhau Shiraguppe) यांचे आज कोल्हापुरमध्ये दुःखद निधन झाले आहे. तर 64 वर्षांचे होते. कामगार चळवळ ते समाजकारण ते साहित्यिक असा त्याचा प्रवास राहिला असून त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी विविध सामाजिक चळवळीत काम केले आहे.
राजा शिरगुप्पे हे निपाणी येथील कामगार चळवळीतून ते समाजकारणात सक्रिय झाले होते. लेखणी ही समाज व्यवस्था बदलासाठी असते या विचाराने त्यांनी आयुष्यभर लेखन केले. बिहार च्या राजकारणावर त्यांचा दांडगा अभ्यास होता.ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीसह प्रगतशील अशा नानाविध चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. सांगली येथे 2010 साली झालेल्या 10 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपददेखील भूषवले होते.
लहान मुलांसाठीही त्यांनी लेखन केले. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभर त्यांचा मित्रपरिवार आहे. गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळे अबालवृद्धांशी त्यांचे मैत्रीचे भावबंध जुळायचे. त्यांच्या निधनामुळे चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या माघारी पत्नी प्रा. मीना शिरगुप्पे, चित्रकार मुलगा रोहन, मुलगी अनुजा, सून असा परिवार आहे.