मुंबई : दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत जे विद्यार्थी पास झाले त्यांना आता अकरावी प्रवेशाची ओढ लागली आहे. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांसाठी आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही अर्ज प्रक्रिया दोन विभागांमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये निकालाआधीच पहिला टप्पा सुरु करण्यात आला होता. तर अर्ज प्रक्रियेचा दुसरा टप्पा निकालांनंतर सुरु करण्यात आला आहे. आता या विद्यार्थ्यंसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी इयत्ता अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया निकालाआधीच सूरू करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती या शिक्षण विभागात ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची माहिती जसं की त्यांचं नाव आणि इतर माहिती भरावी लागणार होती.
तर निकालानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना आपले मार्क्स आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी भराव्या लागणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यासाठी 08 ते 12 जून, अशी मुदत देण्यात आली आहे. यानंतर 19 जून रोजी अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. शिक्षण संचालनालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.