छत्रपती संभाजीनगर: सध्या तरुण वर्गामध्ये आत्महत्याचे प्रमाण खूप वाढले आहे. कोणत्यातरी विचारातुन किंवा तणावामधून ते टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar News) सातारा परिसरामध्ये घडली आहे. उंची कमी असल्याने तणावाखाली येऊन एका 23 वर्षीय तरुणीने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अर्चना विजयकुमार यादव (वय 23 वर्ष राहणार सातारा परिसर) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. अर्चनाचे कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. मात्र, रोजगारासाठी यादव कुटुंबीय गेल्या 20 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असलेल्या सातारा परिसरामध्ये राहत आहे. अर्चनाचे वडील विजयकुमार हे फरशी बसवण्याचा व्यवसाय करतात तर त्यांच्या पत्नी या गृहिणी आहेत. अर्चनाला एक बहीण असून ती विवाहित आहे तसेच तिला दोन भाऊ देखील आहेत.
घटनेच्या दिवशी अर्चना ही आईसोबत घरीच होती. रात्री आठ वाजेच्या सुमारास ती स्वतःच्या खोलीत गेली. काही वेळाने आईने तिला आवाज दिला. मात्र, खोलीतून प्रतिसाद आला नाही. यानंतर आईने खोलीत बघितले असता अर्चनाने खोलीमध्ये गळफास घेतलेला होता. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस अमलदार विष्णू जगदाळे आणि पृथ्वीराज चव्हाण तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी अर्चनाचा मृतदेह खाली उतरवून उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केला. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अर्चना ही गेल्या काही दिवसांपासून कमी उंची असल्यामुळे तणावात होती. यामुळे या तणावातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार विष्णू जगदाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.