रायगड : सध्या तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. एखाद्या शुल्लक कारणावरून तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील गोरेगावमध्ये घडली आहे. यामध्ये महावितरण कार्यालयात नोकरीला असलेल्या 28 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या ( Sucide) केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अभिलाशा अभिमन्यू शेळके (वय 28, रा. मूळ औरंगाबाद) (Abhilasha Abhimanyu Shelke) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. मागच्या 3 ते 4 वर्षापासून ही तरुणी रायगड येथील महावितरण (Mahavitran) कार्यालयात कार्यरत होती. तिने आत्महत्या करण्याअगोदर एक चिट्ठी लिहिली आहे. गोरेगाव पोलिसांनी ती चिट्ठी जप्त केली आहे. या चिट्ठीमध्ये “माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये. हा निर्णय मी स्वतःहून घेतला आहे”, असे तिने आपल्या आईवडिलांसाठी लिहिले आहे.
मृत अभिलाषा शेळके गोरेगाव येथील कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत होती. महावितरणच्या गोरेगाव येथील वसाहतीमध्ये ती एकटीच राहत होती. तिने शुक्रवारी 19 मे रोजी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाणे (Goregaon Police Station) येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उभारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.