कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध पती- पत्नीच्या जीवावर बेतले आहे. हे दाम्पत्य कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे येथील रहिवाशी आहे. मधुकर दिनकर कदम (वय 59 ) (Madhukar Dinkar Kadam) व जयश्री मधुकर कदम (Jayshree Madhukar Kadam) असे पती-पत्नीचे नाव आहे. वडणगे येथील दिंडे कॉलनीमध्ये हे दाम्पत्य वास्तव्यास होते. आयुर्वेदिक औषध घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता त्यांच्या मुलीने वर्तवली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
वडणगे येथील दिंडे कॉलनीत राहणारे कदम दाम्पत्य हे मूळचे शिवाजी पेठेतील आहेत. मधुकर कदम हे एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत. वर्षभरापूर्वी ते आपल्या दोन मुलींसह नवीन घरात राहायला आले होते. वय झाल्याने पती पत्नींना काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास सुरू झाला होता. पंधरा दिवसांपूर्वी मधुमेहाचा त्रास अधिक वाढल्याने दोघांनीही मुक्त सैनिक वसाहत येथील एका डॉक्टरकडून आयुर्वेदिक औषध घेतले होते. आज सकाळी दोघांनी औषधी पावडर पाण्यात मिसळून घेतली.
नंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले आणि त्यांच्या पत्नी स्वयंपाक करत होत्या. यानंतर काही वेळाने जयश्री यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर काही वेळात त्या बेशुद्ध पडल्या. तर तिकडे दूध आणण्यासाठी गेलेल्या शिवपार्वती चौकातील डेअरीत मधुकर कदमही चक्कर येऊन पडले. यावेळी नागरिकांनी कदम दाम्पत्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांना मृत घोषित केले. या दाम्पत्याला 19 वर्षाची गायत्री कदम आणि 17 वर्षाची विजया कदम या दोन मुली आहेत. या घटनेमुळे दोघींवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.