गडचिरोली : काही दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीची रात्री झोपेत कुणीतरी हत्या केली. या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यत एकच (Gadchiroli Crime) खळबळ उडाली होती. गेले 20 दिवस या हत्याकांडाचा पोलिसांकडून तपास सुरु होता. मात्र पोलिसांना काहीच सुगावा लागत नव्हता. हत्येप्रकरणी सुमारे 80 संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली, मात्र तरीही पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. यानंतर चौकशीदरम्यान एक अशी गोष्ट समोर आली त्यावरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
काय घडले नेमके?
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम रंगय्यापल्ली गावात 13 जुलै रोजी 19 वर्षीय तरुणीची निर्दयी हत्या झाली. सकाळी हत्येचा उलगडा होताच गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा तपास सुरु केला. मात्र 20 दिवस पोलीस या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी जंग जंग पछाडले. 80 संशयितांची चौकशी करूनदेखील पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते.
‘असा’ उघडकीस आला गुन्हा?
चौकशीदरम्यान एका महिलेने पोलिसांना मयत तरुणी आणि तिच्या मामेभावाच्या भांडणाबाबत सांगितले. यानंतर पोलिसांनी मामेभावाला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. यानंतर मुख्य आरोपी मामेभावाला पोलिसांनी अटक केली आहे. स्वामी आत्राम असे आरोपी मामेभावाचे नाव आहे.
‘या’ कारणामुळे केला खून?
मयत तरुणीचे घर आणि मामाचे जवळ जवळ होते. त्यामुळे तरुणीचे मामाच्या घरी वरचेवर येणे-जाणे सुरु होते. तरुणीची मामेभावाच्या बायकोशी चांगली गट्टी होती. दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. तसेच दोघी सारख्या फोनवर बोलत असायच्या. आरोपीला आपल्या पत्नीची तरुणीशी मैत्री खटकत होती. त्याने दोन-तीन वेळा तरुणीला पत्नीपासून दूर राहण्यास सांगितले. मात्र तरुणी ऐकत नव्हती. यामुळे आरोपीला तिच्यावर राग होता. याच रागातून आरोपीने आपल्या आतेबहीणीची हत्या केली.