वाशिम : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) होणारे अपघात काही थांबायचे नाव घेईना. ऐन दिवाळीच्या तोंडावर शनिवारी मध्यरात्री वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या कारंजा टोलनाक्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय घडले नेमके?
दिवाळीनिमित्त पुण्याहून वर्ध्याला गावी 4 तरुण निघाले होते. समृद्धी महामार्गावरून जात असताना वाशिमच्या कारंजा टोल नाक्याजवळ नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर एक ट्रक उभा होता. नादुरुस्त असल्याने उभा करण्यात आलेला हा ट्रक कार चालकाला दिसला नाही. ट्रक जवळ येताच कार चालकाने दुसऱ्या लेनमधून गाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी कंट्रोल न झाल्याने सुरक्षा कठड्याला कार धडकली. धडकेनंतर कार पलटी होऊन भीषण अपघात झाला.
या अपघातात वर्ध्यातील कौस्तुभ मुळे हा तरुण जागीच ठार झाला. तर अंकित गडकरी, कार्तिक निपोडे आणि संदेश गावडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मुळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावतीच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.