सांगली : सांगली जिल्ह्यात (Sangli News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Sangli News) विजेचा शॉक लागून आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनिकेत अमृत विभुते (वय 24 रा. माडगुळे ता.आटपाडी) आणि विलास मारुती गुळदगड (वय 45 रा.शेवते ता.पंढरपूर जि. सोलापूर ) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेमुळे आटपाडी तालुक्यावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.
काय घडले नेमके?
आटपाडी तलावात पाणी पातळी कमी झाल्याने विद्युत मोटर पाण्यात ठेवण्यासाठी हे दोघेजण गेले होते. यावेळी (Sangli News) विजेचा शॉक लागला आणि या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आटपाडी तलावातून शेतीसाठी अनेक शेतकऱ्यांनी पाइपलाइनद्वारे पाण्याची सोय केली आहे. माडगुळे येथील सोमनाथ विभुते आणि मधुकर विभुते यांच्यासह चार पाच जणांची सामुदायिक पाइपलाइन आहे. तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने विद्युत मोटर पुन्हा पाण्यात बसवावी लागत आहे.
गुरुवारी दुपारी सोमनाथ विभुते यांनी अनिकेत विभुतेला फोन करून मोटर पाण्यात सोडण्यासाठी जाऊ, असे सांगितले. यावेळी अनिकेतने मी आटपाडी येथे आहे. तुम्ही येऊ नका मी मोटर बसवतो असे सांगितले. अनिकेत विभुते हा पंढरपूर तालुक्यातील शेवते गावातून आलेल्या विलास गुळदगड आणि सखाराम पाटील या दोघांना घेऊन मोटार बसवण्यासाठी तलावावर गेला. यावेळी सखाराम पाटील हे बांधावर थांबले. तलावाच्या बांधावरून अनिकेत विभुते आणि विलास गुळदगड यांनी विद्युत मोटर पाण्यात ठेवली. यावेळी दोघांना अचानक विजेचा शॉक बसला आणि ते पाण्यात पडले. यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.