Manoj Jarange Patil

Maratha Reservation : …तर आज संध्याकाळपासून पाणी पुन्हा बंद; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

913 0

जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न हा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र आरक्षण न मिळाल्यानं त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे, मात्र तरी देखील ते मराठी बांधवांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सरकारला दिला इशारा
‘आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, हे आंदोलन आता थांबणार नाही. आम्हाला अर्धवट आरक्षण नको सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या. आरक्षण किती दिवसात मिळणार ते स्पष्ट करावं. आंदोलन उधळण्याचा प्रयत्न होत आहे. साखळी उपोषणाला बसलेल्यांना पोलीस उचलून नेत आहेत. पोलीस प्रशासन सरकारच्या बाजुनं वागत आहे. मात्र आमचं आंदोलन शांततेच्या मार्गानं चालूच राहणार. सरसकट आरक्षण द्या, अन्यथा आज संध्याकाळपासून पाणी बंद’ असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आज सर्वपक्षीय बैठक
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक सह्याद्री बंगल्यावर पार पडणार आहे. या बैठीकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, चंद्रकांत पाटील, अंबादास दानवे, अनिल परब, सचिन खरात, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि सरकारमधील काही मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत मराठा आरक्षणावर काय निर्णय होणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!