वाशिम : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Maratha Reservation) देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी घेऊन केलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर ओबीसी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळ ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होईल का ही स्थिती निर्माण झाली होती. अशी स्थिती आली असती तर प्रामुख्याने विदर्भातील ओबीसी हा भाजपच्या दूर गेला असता आणि हे भाजपला राजकीय दृष्ट्या परवडणार नव्हतं. त्यामुळे आपला पारंपारिक मतदार असलेला ओबीसी समाज आपल्याकडे पुन्हा एकदा खेचून आणण्यासाठी भाजपने 2 ऑक्टोंबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान ओबीसी जागर यात्रा काढली. आज या जागर यात्रेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोहरादेवी येथे समारोप झाला. आमच्यावर विश्वास ठेवा ओबीसींना धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देऊ असा पुनर्विचार यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
काय म्हणाले फडणवीस?
काँग्रेस पक्षाचा डीएनए हा ओबीसी विरोधी असून राहुल गांधी देखील ओबीसींना फसवत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी जर भाजपला ओबीसींची चिंता असेल तर ओबीसींच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीचे मिनिट्स अद्याप का दिले नाही? असा सवाल करत भाजप ओबीसींसोबत विश्वासघात करत असल्याचा आरोप केला होता.
ओबीसी शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेचे मिनिट्स हे सोमवारपर्यंत विरोधी पक्ष नेत्यांना पाठवू हे मिनिट्स एका खात्याशी संबंधित नसून वेगवेगळ्या खात्यांचा यात समावेश होता. त्यामुळे मिनिट्स मिळायला वेळ लागल्याची माहिती ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्याकडून देण्यात आली आहे.