लातूर : तारीख 29 सप्टेंबर 1993… अनंत चतुर्दशीचा दिवस… हा दिवस कोणच विसरू नाही शकत. या दिवशी घडलेल्या घटनेने (Latur Killari Earthquake) संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या दिवशी अनंत चतुर्दशी असल्याने सगळीकडे गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होत्या. मुंबई पुण्यातल्या प्रसिद्ध बाप्पांचा अपवाद वगळता, बऱ्यापैकी गणपती बाप्पांचं विसर्जन झालं होतं. परभणीतली थोडीशी गडबड सोडता बाकी ठिकाणी शांततेत मिरवणुका पार पडल्या होत्या.त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून शरद पवार राज्यातील आढावा घेत होते. साधारण अडीच-तीन वाजता सगळीकडची माहिती घेऊन शरद पवार आरामासाठी वर्षा बंगल्याच्या खोलीत गेले. त्यांनी पलंगावर अंग टाकलं आणि काहीच मिनिटांत त्यांचा पलंग हादरला. वेळ होती पहाटे 3 वाजून 56 मिनिटे… सारा देश साखरझोपेत असताना महाराष्ट्र भूकंपाने हादरला.
काय घडले नेमके?
भूकंपाचे केंद्र होते लातूर किल्लारी… पण 6.04 रिश्टर स्केलचा भूकंप असल्याने याचे धक्के शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना बसले. धक्केच एवढे तीव्र होते की यात जवळपास आठ हजार माणसे मृत्यूमुखी पडली, सोळा हजार जनावरे दगावली तर अंदाजे 20 हजारांच्या आसपास माणसे जखमी झाली. या कटू प्रसंगाला आज 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच्या कटू आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत. या भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे महाकाय काम तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मोठ्या हिमतीने आणि धीराने पूर्ण केले.
मंत्रालय मुंबईहून सोलापूरला आणले ..
भूकंप झाल्याची माहिती आणि त्याचा केंद्रबिंदू किल्लारी असल्याचे समजताच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे झुंजमुंजू असतानाच तत्काळ किल्लारीत दाखल झाले आणि त्यांनी सर्व परिसराचा आढावा घेतला होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीपेक्षा प्रत्यक्षात खूप मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे, ही बाब लक्षात आल्याने पवार यांनी मंत्रालय मुंबईहून सोलापूरला आणले होते.
किल्लारीमध्ये आज पार पडणार कृतज्ञता सोहळा
दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी इथे स्मृतिदिन भूकंपात बळी पडणाऱ्यांना मानवंदना दिली जाते. यावर्षी या कार्यक्रमाला शरद पवार हजेरी लावणार आहेत. याचवेळी शरद पवार यांनी केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी किल्लारीमध्ये पूर्ण झाली आहे.