धाराशिव : जालन्यात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) व कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू केले असून यामुळे राज्यातील संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात समिती स्थापन केली असून निजामकालीन नोंदी तपासून कुणबी प्रमाणपत्रे देण्याची घोषणा केली आहे.
यादरम्यान धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे ही घटना घडली आहे. तरुणाने आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणा देत गावातील तलावात उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. किसन चंद्रकांत माने (30 असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
काय घडले नेमके?
किसन माने मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असे म्हणत होता. बुधवारी दुपारच्या सुमारासही तो याच विषयावर बोलत होता. एका दुकानासमोर बसून आरक्षणावर चर्चा सुरू असताना किसन याने अंगावरील कपडे काढून मी गेलो तरी तुम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे ओरडत गाव तलावाकडे धाव घेतली. क्षणार्धात त्याने पाण्यात उडी टाकली. त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाळात फसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस प्रशासन गावात दाखल झाले. त्यांच्यासमोरच गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.