पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने (Weather Update) शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.पावसाभावी पीकं सुकून चालले आहेत. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाकडून आता पावसाबाबत नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासोबतच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑगस्टचा जवळपास पूर्ण महिना कोरडाच गेला. मात्र ऑगस्टमध्ये महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेला मान्सून सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच राज्यात बरसायला सुरुवात झाली आहे.
संपूर्ण राज्यात गुरुवारी आणि शुक्रवारी बहुतांश ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून हे क्षेत्र पश्चिम आणि उत्तर-पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हं असल्याने मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहे.