ठाणे : ठाण्यामधून (Thane News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Thane News) पैशांच्या परतफेडीवरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून त्याला जाळण्यात आले. या हत्येप्रकरणी चितळसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अक्षय ठुबे (वय 25) असे या तरुणाचे नाव असून, तो शिवसेनेच्या शिंदे गटाचा पदाधिकारी (उपशाखाप्रमुख) असल्याचे सांगितले जात आहे. या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
अक्षयने गुरुनाथ जाधव (वय 27) याला साडेतीन लाख रुपये दिले होते. मात्र, जाधव पैसे परत करत नसल्याने त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. होते. पैशांच्या तगाद्यासाठी अक्षय त्याला त्रासही देत होता. यामुळे पैशांच्या परफेडीवरून झालेल्या वादातून अक्षयला संपवण्याचा कट रचण्यात आला. त्यानुसार, जाधवने पैशांचा चेक देण्याच्या बहाण्याने अक्षयला मंगळवारी रात्री त्याच्या कोकणीपाडा येथील घरी बोलवले. त्यानंतर जाधव आणि सावरा यांनी अक्षयची कोयत्याने वार करून हत्या केली. नंतर या दोघांसह प्रशांत उर्फ बाबू मारुती जाबर (वय 21) हे तिघे अक्षयचा मृतदेह येथील डोंगर परिसरात घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांनी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी चितळसर पोलिसांनी तातडीने कारवाई करून गुरुनाथ, सावरा आणि प्रशांत यांच्याविरुद्ध हत्येसह अन्य विविध भादंवि कलमातंर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी कोकणीपाडा आणि मानपाडा परिसरात वास्तव्य करतात. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे करीत आहेत.