‘ओ माय गॉड’ म्हणजेच ‘OMG 2 ‘ चित्रपटचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासूनच हा चित्रपट वादात अडकला आहे. गुरुवारी म्हणजेच चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी आग्रा शहरामध्ये ‘OMG 2’ चित्रपटाविरोधात मोठं आंदोलन झालं. पोस्टवरील अक्षय कुमारच्या चेहऱ्यावर आंदोलकांनी काळं फासलं. अक्षय कुमारच्या पुतळ्याचंही दहन आंदोलकांनी केलं. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ‘ओएमजी-2’ चित्रपट हिंदुच्या भावना दुखावणारा असल्याचा दावा केला आहे. हिंदू देवी देवतांचा अपमान ‘ओएमजी-2’ चित्रपटामध्ये करण्यात आल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे. जी व्यक्ती देवांचा अपमान करत आहे त्यांना आम्ही सोडणार नाही. त्याच्याविरोधात कायदेशीर लढाई लढू आणि कठोर कारवाई करण्यास प्रशासनास भाग पाडू अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
10 लाख बक्षीस देणार
आग्र्यातील ‘राष्ट्रीय हिंदू परिषद भारत’च्या कार्यकर्त्यांनी आग्रा येथील फूल सय्यद चौकामध्ये अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटाचं पोस्टर जाळून विरोध नोंदवला. आधी या पोस्टरला काळं फासण्यात आलं. ‘राष्ट्रीय हिंदू परिषद भारत’चे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पाराशर यांनी एक आवाहन केलं आहे. अक्षय कुमारला चपलांची माळ घालणाऱ्या, त्याच्यावर थुंकणाऱ्याला किंवा कानाखाली मारणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस दिलं जाईल असं पराशर यांनी सांगितलं.
शुटींग बंद पाडण्याचा इशारा
‘राष्ट्रीय हिंदू परिषद भारत’चे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पराशर यांनी, अशा चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने परवानगी देता कामा नये असं म्हटलं आहे. यापुढे अक्षय कुमारच्या प्रत्येक चित्रपटावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत, असंही पराशर यांनी जाहीर केलं. तसेच असे चित्रपट बनवणारे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांचं शुटींग बंद पाडू असा इशाराही ‘राष्ट्रीय हिंदू परिषद भारत’ने दिला आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
एका सर्वसामान्य कुटुंबातील कांतीशरण एका मोठ्या समस्येत अडकतो त्याच्या परिवाराचे रक्षण करण्यासाठी महादेव रक्षणासाठी येतात, अशी चित्रपटाची कथा आहे. कांतीशरण मुद्गगल यांचा मुलगा विवेकवर अनैतिक वर्तनाचा आरोप केला जातो. त्यामुळं त्याला शाळेतून काढून टाकण्यात येते. मुलाच्या वर्तनामुळं अडचणीत सापडलेले कांती शहर सोडण्याचा निर्णय घेतात. त्याचवेळी अक्षय कुमार त्यांना त्यापासून परावृत्त करतो व खऱ्या मार्गावर चालण्याचा सल्ला देतो. त्यानंतर कांती सर्वांना कोर्टात खेचतात. मात्र कांती मुलाला न्याय मिळवून देतील का? ते केस जिंकतील का? याची उत्तरे तुम्हाला या चित्रपटामध्ये मिळणार आहेत. या सिनेमात अक्षय कुमार शिवदूतच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.