कोल्हापूर : तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले आणि भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजणी पूर्ण होऊन 3 आठवडे झाले. या मोजणीनंतर एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये देवीचे मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत आता कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती ?
‘छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद केली असता, काही ऐतिहासिक महत्व असलेले मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचे समजत आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्राद्वारे केली आहे.
दररोज वापरात असलेल्या 1 ते 7 क्रमाकांच्या डब्यापैकी क्रमांक 6 डब्यातले 8 ते 10 अलंकार गायब असल्याचे उघड झाले आहे. यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ॲान कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा. गहाळ दागिन्यांची संपुर्ण चौकशी करावी आणि संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. अन्यथा स्वराज्याच्या वतीने मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.