अभिनेता सलमान खान याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याने पोलिसांची झोप उडाली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन एका राजस्थानच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. केवळ टाईमपास म्हणून फोन केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
याबाबतची माहिती अशी की, मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता एका अनोळखी व्यक्तीने फोन करत स्वत:चे नाव रॉकी भाई सांगितले. गोशालारक्षक असून जोधपूर, राजस्थान येथून बोलत असल्याचे सांगितले. ‘मी ३० तारखेला सलमान खानला मारणार आहे, त्याला सांगून द्या’, असे बोलून त्याने फोन कट केला. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक मदतीच्या आधारे धमकीचा कॉल करणाऱ्याच्या मोबाइलचे लोकेशन शोधण्यात आले. लोकेशनच्या आधारे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील डोळखांब येथून फोन आल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला असता साथीदारांच्या मदतीने दुचाकीवरून पळून जात असताना पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
पकडण्यात आलेला अल्पवयीन मुलगा मूळचा राजस्थान येथील रहिवासी असून, शहापूर येथे नातेवाइकांकडे आला असताना त्याने हा फोन केला होता असे तपासात निष्पन्न झाले आहे.
यापूर्वी दोनवेळा सलमानला जीवे मारण्याची धमकी
या पूर्वी एकदा अभिनेता सलमान खानला ई-मेलवर जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली. वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यात आला होता. या अगोदर देखील मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या कार्यालयात धमक्या पाठवल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गुंडांवर गुन्हा दाखल केला होता. धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानला वाय प्लस सुरक्षा पुरवली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलले होते.