Breaking ! मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात, सर्वजण सुखरूप

493 0

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अलिबाग जवळील मांडवा येथे अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उदय सामंत यांच्यासहित बोटीवरील सर्वजण सध्या सुखरुप असल्याची माहिती समोर येतेय. बोट जेट्टीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्यभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी उदय सामंत मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून स्पीड बोटीने निघाले होते. त्यांच्यासोबत माजी खासदार आणि छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती आणि इतर नेते होते.

बोट मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर बोट चालक कॅप्टनने बोट वळवली. पण याचवेळी कॅप्टनचा बोटीवरील नियंत्रण सुटलं आणि बोट जेटीच्या खालच्या पिलरला जाऊन धडकली. सुदैवाने यावेळी बोटीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. संपूर्ण स्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यात आल्यामुळे कुणालाही दुखापत झालेली नाही. उदय सामंत सहित सर्वजण हे सुखरुप आहेत. अपघाताची घटना आमदार महेंद्र दळवी आणि त्‍यांचे सहकारी शिवसेनेचे कार्यकर्ते जेटीवरून पाहत होते. आम्‍हीदेखील या प्रकाराने घाबरलो होतो असे आमदार दळवी म्‍हणाले.

विशेष म्हणजे उदय सामंत यांच्यासोबत यापूर्वी देखील स्पीड बोट बंद पडल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. उदय सामंत हे गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा असा स्पीड बोटीने प्रवास करत होते. या दरम्यान, अचानक स्पीड बोट बंद पडली. बोटीतील यंत्रणा बंद पडल्याने बोट चालक कॅप्टनला आपात्कालीन संदेश पाठवणंही कठीण झालेलं. पण सामंत यांच्या स्वीय साहाय्यकाने तात्काळ दुसरी बोट बोलावलेली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!