आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये राज्य सरकारने सावधानतेच्या दिलेल्या इशाऱ्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. संस्थांनच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, चीन, अमेरिका, जपानसह अनेक देशांमध्ये कोरोनाची लाट पुन्हा आली आहे. या देशांमध्ये संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने आपल्याकडे केंद्र आणि राज्य सरकारने सावधान राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
या संसर्गाचा संभाव्य फैला रोखणे हे शासनाबरोबर आपणा सर्वांचेही कर्तव्य आहे. तीर्थक्षेत्र आळंदी येथे येणारे भाविक वारकरी ग्रामस्थ आणि अन्य दर्शनार्थी तसेच व्यापक सामाजिक हित विचारात घेऊन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीने सर्वांना विनम्र आवाहन करण्यात येते की, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आणि परिसरात गर्दी करू नये. वयोवृद्ध लहान मुले तसेच आजारी व्यक्ती यांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मंदिर व परिसरात सर्वांनी मास्क घालूनच प्रवेश करावा.