मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना काल पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबत युतीत सडलो असा पुनरुच्चार केला. त्यावर बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का ? असा संशय आमच्या मनात येतोय, असं प्रत्युत्तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
फडणवीस म्हणाले की, काल उद्धव ठाकरे यांनी युतीत सडलो असं वक्तव्य केलं. 2012 पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीत होते. त्यांच्या हयातीत युती कायम ठेवली. बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का? असा संशय आमच्या मनात येतोय. फडणवीस म्हणाले की, तुमचा पक्ष जन्माला यायच्या आधी आमचा मुंबईत नगरसेवक होता, आमदार होते. भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणुक शिवसेनेने लढवली. मनोहर जोशी भाजपच्या चिन्हावर लढले होते. भाजपच्या सोबत असताना एक नंबर वर होते आणि आता चार नंबरवर आले. म्हणजे लक्षात घ्या कुणाबरोबर कोण सडलं.
तुम्ही साधं औरंगाबादचं संभाजीनगर केलं नाही. उस्मानाबादचं धाराशिव करू शकले नाहीत. तुमच्याच घोषणा होत्या ना? तिकडे भाजपने प्रयागराज करून दाखवलं. राम मंदिर मोदींनी करून दाखवलं. त्यांनी करून दाखवलं तुम्ही बोलत राहिलात. तुम्ही दुर्गाडीचा प्रश्न तरी सोडवा. तुमचं हिंदुत्व हे भाषणातलं कागदावरचं आहे. अशी टीका फडणवीस यांनी केली.