मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना संपूर्ण हादरून गेली आहे. आज शिवसेना भवनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. ‘ठाकरे आणि शिवसेनेचं नाव न वापरता जगून दाखवा’ असे सांगत त्यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले.
मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना संपूर्ण हादरून गेली आहे. आज शिवसेना भवनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. ‘ठाकरे आणि शिवसेनेचं नाव न वापरता जगून दाखवा’ असे सांगत त्यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले.
शिवसेना भवनावर आज शिवसेना जिल्हाप्रमुख, विभाग प्रमुख आणि इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. “मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे”, असे म्हणत त्यांनी बंडखोरांना इशारा दिला आहे. “महत्वाकांक्षा असावी पण अशी नसावी की ज्यानं दिलं त्यालाच खावं. तुम्हाला आमदार घेऊन जायचे आहेत घेऊन जा…आणखी कुणाला जायचं असेल त्यांनीही जा. जे गेले ते माझे कधीच नव्हते असं मी समजेन. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे याचा मला आनंद आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, ” जे सोडून गेले त्यांच्या बाबत अधिकचा विचार न करता आता पक्षाचे संघटन महत्वाचे असून माझी इच्छाशक्ती दांडगी आहे. त्यावर सर्वकाही सुरळीत होईल. आतापर्यंत शिवसेनेचा आणि ठाकरे नावाचे वलय होते याचा विसर आमदारांना पडला आहे. सध्या ज्या भूमिकेत बंडखोर आहेत त्यामागे मोठ्या पक्षाचा हात आहे. मात्र, तेथेही भविष्य दिसत असेल तर खुशाल जा पण माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा” असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना दिले आहे.
“ज्यांनी मातोश्रीवर आणि माझ्या कुटुंबीयांवर घाणेरडे आरोप केले आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मी शांत आहे पण षंड नाही. ज्यांची स्वप्न होती ती आपण आजवर पूर्ण केली. पण आणखी काही स्वप्न असतील तर त्यांनी जावं. सेनेची मूळं आज माझ्यासोबत आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे. हीच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का? आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे चालतं. तुम्हाला तुमच्या मुलाला मोठं करावसं वाटतं मग मला वाटणार नाही का. या सगळ्या गोष्टीचा वीट आला आहे. पण ही वीट आता डोक्यात हाणणार”, विधान करत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
“मी माझ्या मानेचं ऑपरेशन केलं तेव्हा मोदींनी मला सांगितलं तुम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ही खूप मोठी हिंमत दाखवली. त्यावेळी मी मोदींनाही म्हटलं होतं हिंमत माझ्या रक्तात आहे. पहिलं ऑपरेशन ठिक होतं. पण ऑपरेशननंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उठलो तेव्हा माझ्या शरीराच्या काही भागांच्या हालचाली बंद पडल्या आहेत असं जाणवू लागलं. त्यामुळे दुसरं ऑपरेशन करावं लागलं. याकाळातही विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. चार ते पाच महिने मी कुणाला भेटू शकलो नाही. त्याचा असा फायदा घेतला जात आहे”