पुणे : पुणे आणि सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे उजनी आणि वीर धरण 100 टक्के भरल्याने भीमा आणि नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.यामुळं चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागल्यानं नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
उजनी धरणातून भीमा नदीत सुमारे 40,000 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आलाय. त्यामुळे नीरा आणि भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पंढरपुरातील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळ तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरही पाण्याखाली गेली आहेत. शहरातल्या नदीकाठीच्या सखल भागात असलेल्या नागरिक आणि झोपडपट्टीधारकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम प्रशासनाने सुरू केलं आहे. विठ्ठल दर्शनापूर्वी चंद्रभागेच्या स्नानाला आलेल्या भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.