नागपूर : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधिमंडळात गोंधळ पाहायला मिळाला. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची केस रिओपन करा. या प्रकरणाची पुन्हा एकदा कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली.
कोण होती दिशा सालियन ?
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची याची माजी मॅनेजर दिशा सालियन होती.बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू झाला होता.दिशाच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात राजकीय वादंग निर्माण झाला होता. या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले होते. आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र, सीबीआयने अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे ठरले आहेत.
CBI च्या अहवालानुसार …
दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने अहवाल सादर केला असून तिचा मृत्यू अपघाती असल्याचं स्पष्ट केलं. दारूच्या नशेत तोल गेल्याने आणि १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याचं सीबीआयने सांगितलं असून तपास बंद केला आहे. दरम्यान याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिशाचा सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप राणेंनी केला होता.
“मी सीबीआयने नोंदवलेल्या निरीक्षणासाठी त्यांना दोष देणार नाही. ७२ दिवसांनी सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला होता. ८ जूनपासून महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने इतक्या चांगल्या पद्धतीने सर्व पुरावे मिटवण्यात आले की, सीबीआयकडे तपास आला तेव्हा काहीच सापडलं नाही,” असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
दरम्यान, नारायण राणेंनी दिशा सालियान खून प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियानचा खून झाला. तिच्यावर अत्याचार करून खून झाला. त्या प्रकरणातील आरोपींना का अटक झाली नाही. कोण मंत्री होता? का वाचवण्यात आलं? सचिन वाझेंना पोलीस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवलं,” असे आरोप नारायण राणेंनी केले होते.