TOP NEWS SPECIAL REPORT : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार फिक्स होती का ? फिक्स नव्हती तर काय होती रिस्क

302 0

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानं रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. भाजपाचे मुरजी पटेल शड्डू ठोकून मैदानात उतरले याच दरम्यानच्या काळात शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवण्यात आलं ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेनेला विशेषतः उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात होता. कारण शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं होतं आणि त्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढतील असंचं शिवसेनेनं ग्राह्य धरलं होतं.

पुढे निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर मशाल हे निवडणूक चिन्ह देऊ केलं आणि ऋतुजा लटके या मशाल चिन्हावर लढण्यासाठी सज्ज झाल्या खऱ्या मात्र ऋतुजा लटके या बृहनमुंबई महानगरपालिकेत सहाय्यक लिपिक या पदावर कार्यरत होत्या आणि नियमानुसार जर शासकीय सेवेतील व्यक्तीला निवडणूक लढायचे असेल तर त्या व्यक्तीला संबंधित पदाचा राजीनामा द्यावा लागतो याच नियमानुसार महानगरपालिकेत राजीनाम्यासाठी अर्ज केला मात्र त्यांचा राजीनामा अर्ज स्वीकारण्यासाठी विलंब झाला आणि अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उच्च न्यायालयात गेला आणि उच्च न्यायालयानं ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले. आणि अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके या रिंगणात उतरल्या तर भाजपाकडून मुरजी पटेल रिंगणात उतरले.

आता मुरजी पटेल यांच्या बद्दल बोलायचं झालं तर पटेल हे आधी काँग्रेसच्या आणि नंतर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. मात्र या निवडणुकीत नंतर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असणाऱ्या संदीप नाईक यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केलं कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने मुरजी पटेल यांचं नगरसेवक पद रद्द ठरवत त्यांना सहा वर्षासाठी निवडणूक लढवण्यासाठी अपात्र केलं आणि आता जेव्हा मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला, तेव्हा संदीप नाईक यांनी हाच मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आणि त्यानंतरच मुर्जी पटेल रिंगणात राहणार का ? अशा चर्चांना उधाण आलं असतानाच , रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करण्याचा आवाहन केलं होतं.

राज ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यावेळी बोलताना पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या बीड लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला नव्हता अशी आठवण करून दिली. त्यानंतर आज सोमवारी सकाळी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक बिनविरोध होईल अशी मला आशा असल्याचं सांगितलं होतं. आणि अखेर दुपारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत मुरजी पटेल आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असून ते अपक्ष म्हणून सुद्धा ही निवडणूक लढणार नाहीत अशी घोषणाच करून टाकल्यानं आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार फिक्स होती का ? असाच प्रश्न उपस्थित होतोय.

– संकेत देशपांडे

रिपोर्टर, TOP NEWS मराठी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!