पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वादंग निर्माण झाला. त्यावर उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला आहे. तसेच राज्यपालांनी ज्यावेळी हे वक्तव्य केले त्यावेळी व्यासपीठावर शरद पवार आणि नितीन गडकरी होते, का नाही त्यांनी यावर बोललेत, भाषणात बोलायला पाहिजे होतं, असं उदयनराजे म्हणालेत.
शिवरायांचा अपमान करणारी अशी विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या देशाला जर महासत्ता बनवायची असेल तर शिवाजी महाराजांचे विचार महत्वाचे आहेत. या वक्तव्याचा राग आज सामान्य लोकांना आला आहे. सिनेमाच्या माध्यमातून चित्रपट व्यवस्थीत सेन्सर होत नाही, कुठे गेले तुमचे विचार, असं म्हणत सिनेमातून दाखवल्या जाणाऱ्या इतिहासावर भाष्य केलंय.
सर्वधर्म जातीच्या लोकांना एक ठेवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा सोडून चालणार नाही, नाहीतर या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. शिवाजी महाराजांनी त्यांचे कुटुंब मानले नाही तर देशाला त्यांनी कुटुंब मानलं आहे. शिवाजी महाराजांनी लोकशाहीची संकल्पना मांडली. शिवाजी महाराजांनी।नेहमी रयतेचं राज्य मानलं. त्यांनी स्वतःचे राज्य कधीच मानले नाही. त्यांनी कधीही मीपणाला थारा दिला नाही. मी म्हणजे समाज असं ते मानायचे. मात्र आता सगळ्या गोष्टी व्यक्ती केंद्रित झाल्या आहेत, असं उदयनराजे म्हणालेत.