TOP NEWS SPECIAL REPORT : हिवाळी अधिवेशनाची भरकटलेली ‘दिशा’

535 0

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचं अखेरीस सूप वाजलं कोरोनामुळं तब्बल दोन वर्ष नागपुरात होऊ न शकलेलं हिवाळी अधिवेशन यंदा या दोन वर्षाच्या खंडानंतर प्रथमच नागपूरला झालं राज्यात अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन होतं. मात्र या हिवाळी अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी घडल्या वैयक्तिक हेवेदावे, आरोप झाले आणि विकासात्मक चर्चा राहूनच गेली.

शिंदे गटाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद असणाऱ्या राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालीयन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचं सांगितलं आणि त्याचे तीव्र पडसाद राज्य विधिमंडळात उमटले सत्ताधारी पक्षाच्या वतीनं दिशा सालीयन मृत्यू प्रकरणाचे फाईल पुन्हा एकदा ओपन करावे असे मागणी करण्यात आली आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत SIT चौकशी करणार असल्याचं सांगितलं दिशा सालीयनच्या यावरून झालेला सत्ताधाऱ्यांच्या गदारोळामुळे अधिवेशनाचा कामकाज एका दिवसात तब्बल पाच वेळा तहकूब करण्याची वेळ विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापतींवर आली. यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांनी कामकाज बंद पडल्याची नोंद होईल एवढं मात्र नक्की ! याच दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं अधिवेशन काळापुरतं निलंबन करण्यात आलं

उध्दव ठाकरेंची अधिवेशनात एन्ट्री

दरम्यान इकडे दिशा सालीयन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात एन्ट्री केली आणि विधान परिषदेत जोपर्यंत सीमा वादाचा मुद्दा सुटत नाही तोपर्यंत सीमावादावरील भाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली. 29 नोव्हेंबर 2022 ला राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळला आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्याचवेळी आपण विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं मात्र उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा न देता थेट नागपूर अधिवेशनात येत सीमावादावर भक्कम बाजू मांडली.

सीमावादाचा ठराव आणि लोकायुक्त विधेयक

तब्बल दोन आठवडे चाललेल्या हिवाळी अधिवेशनातील पहिला आठवडा हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या गदारोळात अक्षरशः वाया गेला. मात्र दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी राज्याच्या विधिमंडळात महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाविषयीचा ठरावाला आणि तो दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर देखील झाला. त्यानंतर मागील अनेक वर्षांची मागणी असणाऱ्या विधेयक देखील चर्चेविना सभागृहात मंजूर झालं

पुन्हा गोंधळ पुन्हा गदारोळ

दुसऱ्या आठवड्यात ही दोन महत्त्वाची विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधक सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा एकदा गदारोळाची स्थिती निर्माण झाली दररोज सकाळी नागपूर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करायचे त्याला सत्ताधारी देखील आंदोलनाने प्रत्युत्तर द्यायचे कथित नागपूर भूखंडावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेण्याचा प्रयत्न केला तर जमीन आणि अन्य मुद्द्यांवरून शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार,उदय सामंत शंभूराजे देसाई,दादा भुसे, यांना देखील घेण्याचा सभागृहात प्रयत्न झाला.

एकंदरीतच काय तर वर्षातील एक अधिवेशन नागपुरात घेण्यामागं विदर्भाचा अनुशेष भरून काढणे आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विकासात्वक चर्चा होणं महत्त्वाचं असताना या अधिवेशनात मात्र वैयक्तिक हेवेदावे वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप यामध्येच अधिवेशनाचे दोन आठवडे वाया गेलेत त्यामुळे हिवाळी अधिवेशनाची ‘दिशा’ भरकटली असंच म्हणावं लागेल

– संकेत देशपांडे
रिपोर्टर, TOP NEWS मराठी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!