मुंबई : कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले . 41 दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली . परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यांच्यावर दोन वेळा एन्जिओप्लास्टी देखील करण्यात आली. परंतु 41 दिवसांपासून ते बेशुद्ध अवस्थेतच होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. त्यानंतर त्यांच्या मुलीला आणि पत्नीला भेटण्याची परवानगी मिळाली होती.
परंतु आत्तापर्यंत त्यांना शुद्धीवर येणे आवश्यक होते असे डॉक्टरांचे म्हणने होते. त्यामुळेच कुटुंबीय चिंतेत होते. एम्स रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची टीम राजू यांच्यावर उपचार करत होती. परंतु आज 41 दिवसानंतर त्यांची मृत्यूशी झुंज संपुष्टात आली आहे.
विनोद क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणारे ,आपल्या खास शैलीमध्ये बॉलीवूडमध्ये देखील शून्यातून ओळख निर्माण केलेले राजू श्रीवास्तव हे आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.