पुणे : राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या महाराष्ट्रात चांगलाच वाद पेटलाय. वीर सावरकर हे इंग्रजांची पेंशन घेत होते. त्यांच्यासाठी काम करत होते, असं वक्तव्य आधी राहुल गांधी यांनी वाशिममध्ये केलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सणकून टीका केली. महाराष्ट्रात सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं. तर महाराष्ट्राची जनता याला उत्तर देईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
राहुल गांधी यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र माझ्याकडे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. इंग्रजीत असलेल्या या पत्रात, सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ… असं लिहिल्याचं राहुल गांधी म्हणाले. अलोका येथील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एक कागदपत्र दाखवत हेच ते सावरकरांचे ब्रिटिशांना लिहिलेले पत्र असल्याचा दावा केला.
या प्रकरणावर आता हिंदू महासंघाचे नेते आनंद दावे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्या आजीने म्हणजेच इंदिरा गांधी यांनी सावरकरांना देणगी दिली होती. त्यांनी सावरकरांच्या कर्तृत्वाबद्दल बोलताना पत्रात धाडसी असा उल्लेख केला, तो काय कुणाच्या दबावाखाली केला होता का ? राहुल गांधींनी त्यांच्या आजीने सावरकरांना लिहिलेलं हे पत्र वाचलं नव्हतं का, असा सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.
सावरकर यांनी माफी मागितली हे निश्चितच खरं आहे. कारण बाहेर येऊनच ते काम करू शकले असते.. पण त्या पत्रात एकवेळ मला सोडू नका पण इतरांना तरी सोडा असंही वाक्य आहे. या वाक्याबाबत राहुल जी काय बोलणार आहेत, असा प्रतिसवालही आनंद दवे यांनी केलाय.