भोर : पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. विजेचा धक्का बसून एकाच गावातील चौघांचा मृत्यू झाला. यात बाप-लेकासह एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळं निगडे धांगवडी या गावावर शोककळा पसरलीये.
भोर तालुक्यातील निगडे धांगवडी या गावात आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्यानं आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यानं चौघांचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत. ही घटना घडण्या आधी सतत सहा वेळा वीज गेली होती. चौघांचे मृतदेह मिळाले असून घटनास्थळी महसूल, महावितरण राजगड पोलीस आणि आरोग्य विभाग कर्मचारी दाखल झाले आहेत.