मुंबई : नुकतीच महिलांच्या बाबत आक्षेपार्ह विधाने झाल्याने महिला नेत्यांमध्ये सध्या धुसफुस सुरू आहे. राजकारणामध्ये राजकीय कामकाज सोडून महिलांवर अवमानकारक भाषेत केली जाणारी टीका टिप्पणी आणि त्यावर गृह खात्याने कोणतीही न केलेली कारवाई याचा संताप व्यक्त करण्यासाठी आज विरोधी पक्षातील महिला आणि खासदारांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.
या भेटीमध्ये गृह खात्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असल्याचे समजते. यावेळी खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार प्रियंका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, आमदार मनीषा कायंदे, आमदार अदिती तटकरे, विद्या चव्हाण, आमदार ऋतुजा लटके आदी महिला नेत्या उपस्थित होत्या.
या महिला नेत्यांनी राज्यपालांकडे गृह खात्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, सत्तेतीलच नेते महिलांविरोधात विधाने करतात. अश्लील टिप्पणी करतात त्यांना सरकारकडून साधी समाज दिली जात नाही. गृह खात्याकडून देखील या नेत्यांना समज दिली जात नाही. अशी नाराजी यावेळी या व्यक्त करण्यात आली.
तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आव्हाडांवर दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचा या महिला नेत्यांनी म्हटल आहे. राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून विरोधकांना टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलं गेलं आहे. यानंतर तातडीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने राजभावनावर दाखल झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील करण्यात आली आहे यावेळी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना काही सूचना दिल्या असल्याचे देखील समजत आहे.