ग्रामीण भागामध्ये तमाशाला अनन्यसाधारण महत्व आहे. तमाशा म्हटले की प्रत्येकाच्या अंगात उत्साह संचारतो. गावच्या जत्रेत तमाशाचा फड रंगला नाही तरच नवल. तमाशाला नारळ वाढवण्याचा मान मिळवण्याची प्रथा ग्रामीण भागामध्ये प्रचलित आहे. यासाठी अनेक ठिकाणी बोली लावली जाते. मात्र बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज येथील बातच न्यारी.
बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज येथे ग्रामदैवत भैरवनाथाची वार्षिक यात्रा भरते. या यात्रेत तमाशाचे आयोजन केले जाते. तमाशाला नारळ वाढविण्याचा मान मिळवण्यासाठी लिलावाची प्रथा आहे. यावेळी गावातील राजेंद्रभाऊ यांनी तब्बल १ लाख २५ रुपयांची बोली लावून रात्री तमाशाला नारळ वाढविण्याचा मान मिळवला. तर दिवसा होणाऱ्या तमाशाचा नारळ वाढविण्यासाठी नवनाथ वायाळ यांनी तब्बल ५५ रुपयांची बोली लावली. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बोली लागल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.
करोनामुळे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून तमाशा बंद होता. त्यामुळे अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांना दोन वेळचे अन्न मिळणे महाग झाले होते. मात्र यंदाच्या वर्षी अनेक ठिकाणी अनेक गावात यात्रांना चांगली गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी चांगली बोली लावून तमाशे केले जात आहेत.