सुखविंदर सिंह सुक्खू : दूध डेअरी चालक ते हिमाचलचे मुख्यमंत्री !

556 0

हिमाचल प्रदेश : सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आज हिमाचल प्रदेशचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काँग्रेसला हिमाचल प्रदेशमध्ये विजय मिळाल्यापासून मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून वाद सुरू होता. अनेक दिग्गज मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. गेली 40 वर्षांपासून वीरभद्र कुटुंबाचा हिमाचल प्रदेशच्या राजकारणात असलेला दबदबा पाहाता प्रतिभा सिंह यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल, असा अंदाज वर्तवला जात होता परंतु या सर्व शक्यतांना शनिवारी संध्याकाळी पूर्णविराम मिळाला आणि काँग्रेस हायकमांडनं सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सर्वांना मागं सारून सुखविंदर सिंह सुक्खू यांनी बाजी मारली. दूध डेअरी चालक ते हिमाचलचे मुख्यमंत्री बनलेल्या सुखविंदर सिंह सुक्खू यांचा कसा राहिलाय राजकीय प्रवास…

सुखविंदर सिंह सुक्खू हे एका सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्त्व. ते मूळचे हिमाचल प्रदेशमधील हमीरपूरचे. राजकारणात कुणीही गॉडफादर नसताना सुखविंदरसिंह सक्खू यांनी प्रचंड मेहनत घेऊन राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांचे वडील बसचालक होते. सुरुवातीच्या काळात ते शिमल्यात एक लहान दूध डेअरी चालवत होते. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयमधून सुरू केली. त्यातूनच त्यांना फायरब्रँड लीडर म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर ते हळूहळू एक युवा नेता म्हणून उदयास आले आणि 1988 मध्ये एनएसयूआयच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली.

त्यानंतर 1995 मध्ये त्यांच्याकडे युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाची धुरा आली. सक्खू यांनी हिमाचल प्रदेश युवक काँग्रेसचे प्रमुख म्हणून जवळपास दहा वर्षे काम केलं. 2003 मध्ये त्यांनी नादौनमधून पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर 2007 मध्ये दुसऱ्यांदा विजय मिळवला परंतु 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांनी 2013 मध्ये हिमाचल प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलं. जवळपास सहा वर्षे ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. मग मात्र 2017 आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळाला. चार वेळा आमदार राहिलेले सुक्खू हे दोन वेळा सिमला महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून निवडून आले होते. आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत सुक्खू यांनी त्यांचं सरकार आणि सहा वेळा काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना घेरण्यास मागंपुढं पाहिलं नाही.

राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सुखविंदरसिंह सुक्खू यांचा पुढील पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ त्यांच्यासाठी सुकर ठरणार की मुख्यमंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेली मंडळी त्यांच्या वाटेत काटे पेरणार
हे येणारा काळच ठरवेल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!